Mangesh Narayanrao Kale (मंगेश नारायणराव काळे)
हा शब्द असाही लिहिता येतो
हा शब्द असाही लिहिता येतो
कासव हा शब्द
ससा असा नाही लिहिता येत
फार तर पळवता येतो द्रुत
नि पोहचतोही तो सशाअगोदर
ससा हा शब्द
कासव असा नाही लिहिता येत
फार तर झोपवता येऊ शकतो
यथेच्छ कुरणात परंपरागत
नि निघून जाऊ शकते कासव पुढे
माणूस हा शब्द मात्र
वानर असाही लिहिता येतो
म्हणजे वानर लिहिल्यावर
माणसाच्या जागी नॅचरली
एक ॲडीशनल शेपूटही
लिहावी लागतेच आपसूकच
प्रसंगी तो सेतू बांधतो
करतो पार सात समुद्र
पादाक्रांत करतो लंका
देतो आहुती प्राणांची
नि निःपातही करतो
दशाननाच्या साम्राज्याचा
माणूस हा शब्द मात्र प्रत्येक कवीनं
वेगवेगळा लिहिलेला असू शकतो
म्हणजे वाल्मीकीनं लिहिलाय नेमका तसा
किंवा कसाही ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे
म्हणजे माणसाच्या जागी वानर लिहून
सोयच केलेली असते दुसऱ्या माणसांची
नि दिलेला अस्तो प्रतिशब्द पहिल्या माणसाला
एका कवींनं माणसाला दिलेला प्रतिशब्द राक्षस
या शतकातही अजून तसाच तर टिकुनेय
वानराचं प्रत्यक्ष माणसात रूपांतर झाल्यावरही
नि माणूस हा बिनशेपटीचा वानरच आहे
हे तर लिहिलंच गेलेलं नाहीये अजून
फार्फार वर्षापूर्वी शेपूट गळून पडल्यावरही
माणूस हा शब्द मात्र अजूनही
कसाही लिहिता वाचता येतो कुणालाही सहज
२
आत्महत्या हा शब्द कुणीही लिहू शकतो
म्हणजे ज्याला गिरवता येते पहिले अक्षर
किंवा निरक्षर साक्षात ठसा अंगठ्याचा
म्हणजे कवी असेल पेंटर नट डोंबारी
तर लिहितोच लिहितो कैफात वळणदार
म्हणजे नर असेल किंवा मादा किंवा तृतीयपंथी
म्हणजे कुणीकुणीही लिहू वाचू शकतो
या पृथ्वीतलावर जन्माला आलेला
द्विपाद किंवा चतुष्पादही डोळस
म्हणजे आत्महत्या हा असा एकमेव शब्दय
जो लिहिता वाचता येण्यासाठी अजून तरी
अट नाहीये कोणतीच साक्षर असण्याची
नि आता आताशा तर निरक्षरच सारे
मातीतून घाम पिकवणारे कष्टी
लिहू लागलेयत वळणदार आत्महत्या हा शब्द
म्हणजे प्रतिशब्दच शोधून काढलाय
या निरक्षरांनीच आत्महत्या या शब्दाला
जो लिहिता किंवा वाचण्याचीही नस्ते गरज कधीच
आत्महत्या हा शब्द
आता शेतकरी असाही लिहिता येतो
३
पाणी हा एक असा शब्दय जो काढता येतो
विहिरीतून समुद्रातून नदी नाला तलाव
किंवा फार्फार तर घरातल्या माठातून सुद्धा
म्हणजे किती सहज होतं पाणी हा शब्द लिहिणं
म्हणजे थेट नळाला लावला तांब्या कुणीही
तरी यायचा भरून क्षणार्धात पाणी हा शब्द
म्हणजे विहिरीत सोडला दोर हातभर
किंवा परततांना शेतातून घेता येत होतं
नदीवर पाणी भरून कळशीत अगदी सहज
म्हणजे खळाळ वाहत राहायचा पाणी हा शब्द
कुठेही कधीही केव्हाही विनासायास विनाअट
नव्हतंच काही अनवट पाण्याआड दडलेलं
नव्हती मैलोन्मैल भटकंती नव्हता खडखडाट
विहिरीच्या तळाशी रिकाम्या बादलीचा
नव्हती सुकली नाळ नळाची दूरवर पसरलेली
खरं तर उडून गेलाय पाणी हा शब्द गावातून
नदीतून विहिरीतून थेट माठातून सुद्धा नकळत
म्हणजे गहाळच झालंय आद्याक्षर पाण्याचं डोळ्यातून
नि लिहिताच येत नाहीये कुणालाच या सेन्चुरीत